विशेष संपादकीय…
सिद्धाराम पाटील : खेड्यातलं पोर झालं “सकाळ”चे संपादक !
राष्ट्रीय विचारांचे भरभक्कम अधिष्ठान असलेले व स्वामी विवेकानंद यांच्या आधुनिक विचारांनी प्रभावित झालेले श्री. सिद्धाराम भैरप्पा पाटील (वय-४३ वर्षे) यांची दैनिक सकाळच्या सोलापूर आवृत्तीच्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाली आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
ते आजपासून सकाळच्या सेवेत रुजू होत आहेत, ही बाब आम्हा मित्र-परिवारासाठी अत्यंत भूषणावह आणि अभिनंदनीय आहे.आमच्या मित्र परिवारात सर्वांना हवेहवेसे वाटणारे सिद्धाराम हे अत्यंत शांत, संयमी, नम्र, अभ्यासू व सद्गुणी आहेत. स्पष्ट वक्तेपणा व सडेतोड बाणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्टय आहे. सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर दक्षिण सोलापूर तालुक्यात शिर्पनहळ्ळी हे पाचशे लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे.
विकासापासून कोसो दूर असलेल्या येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात सिद्धाराम यांचा जन्म झाला,त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावातील एक शिक्षकी जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना धोत्री हे गाव गाठावे लागले. तेथे त्यांनी होटगी संस्थानच्या श्री भगवती गौरीमाता प्रशालेतून दहावीपर्यतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद आणि नंतर वालचंद महाविद्यालयात बी.एस्सी. (गणित) डिग्री पूर्ण केली. या उच्च शिक्षणापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
वडील भैरप्पा हे चौथीपर्यंत शिकलेले तर आई कमलाबाई या पूर्णपणे निरक्षर, अशा घरात शिक्षणाचा फार लवलेश नव्हता. दोन मोठ्या बहिणी भागिरथी रामण्णा चिवडशेट्टी (राहणार : गंगाधर कणबस) व सरस्वती गुरुनाथ शिवमूर्ती (राहणार: नागणसूर) यांचे अनुक्रमे चौथी व बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे तर धाकटा भाऊ परमेश्वर हा नववीपर्यंतच शिकू शकला. अशा स्थितीत सिध्दाराम यांनी एम.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडून “टीडीएफ” या टेक्स्टाईल संशोधन संस्थेत नोकरी स्वीकारली. तीन चार महिन्यांतच ते दैनिक तरुण भारतमध्ये रुजू झाले. नंतर दिवसा शिक्षण आणि संध्याकाळनंतर पत्रकारिता असे करीत त्यांनी सोलापूर विद्यापीठातून पत्रकारिता पदवी (बी.जे.) घेतली.
- दरम्यान, २००९ मध्ये सिद्धराम यांना जीबीएस (GBS: Guillain-Barré syndrome) या जीवघेण्या आजाराने घेरले. सुमारे आठ महिने ते बेडवरच होते. शरीराची कुठलीच हालचाल नव्हती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांना स्वतःच्या पायावर थोडे उभे राहता येऊ लागले. अशा स्थितीत त्यांनी विद्यापीठात पदव्युत्तर (एम.जे.) शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सिद्धाराम यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांवर चांगले प्रभुत्व आहे.
सन २०११ मध्ये जीबीएस (GBS: Guillain-Barré syndrome) याचा विळखा बऱ्यापैकी दूर झाला होता. मग भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठीसाठी संभाजीनगर येथे वेब पोर्टलसाठी एक वर्षे काम केले. त्यानंतर “दिव्य मराठी”च्या सोलापूर आवृत्तीत मुख्य उपसंपादक म्हणून १३ वर्षे काम केले.
दरम्यानच्या काळात पत्रकारिता करतानाच त्यांनी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे विवेक विचार या सांस्कृतिक मासिकाचे संपादक म्हणून १६ वर्षाहून अधिक काळ काम पाहिले. राष्ट्रीय विचारांच्या प्रसार व प्रचारासाठी समविचारी मित्रांना सोबत घेत जटायु अक्षरसेवा ही प्रकाशन संस्था सुरू केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेटवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून ५ वर्षे काम पाहिले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळवर ते सदस्य होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ तथा शिवस्मारक, सोलापूरचे विश्वस्त म्हणूनही काम केले. विशेष म्हणजे सिद्धाराम यांनी पत्रकारितेतून स्वतःला विकसित करीत असताना सुट्टीच्या दिवशी शिर्पनहळ्ळी येथे जाऊन स्वत:च्या वडिलोपार्जित शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्यांचे शेतीविषयक ज्ञानसुद्धा वाखाणण्याजोगे आहे.
- सर्वस्पर्शी बाबासाहेब, गोधन, राष्ट्रवाद ३६० अंशातून, समिधा (श्रीगुरुजी स्मृती ग्रंथ) आदी विशेष ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे.
- सोलापुरात नोव्हेंबर २०१३ मध्ये (विवेकानंद सार्ध शती वर्ष) झालेल्या विवेकानंद साहित्य संमेलनाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व्यक्तिमत्त्व विकास, योग हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी विविध विषयांवर ३०० हून अधिक लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत.
- पी. सिद्धाराम या नावाने ते ब्लॉगलेखन करतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये भीम प्रतिष्ठानचा गौरव पुरस्कार, बसवरत्न पुरस्कार, विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०१९ यांचा समावेश आहे.
साधी राहणी व उच्च विचारसरणी आणि मूर्ति लहान पण किर्ती महान अशा सिद्धाराम व माझा २२ वर्षांचा दोस्ताना व कौटुंबिक नाते आहे. आज हे नाते काका-पुतण्याच्या नात्याने दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. आधुनिक काळातील बदलत्या पत्रकारितेतील अनेक आव्हाने सिद्धाराम यांनी स्वत: पेलली असल्याने आज त्यांची सकाळच्या सहयोगी संपादकपदी झालेली नियुक्ती ही एक गरुडझेप म्हणावी लागेल.
शिक्षक होता होता घडला पत्रकार…
बी.एस्सी.उत्तीर्ण झाल्यानंतर सिद्धाराम यांना स्वत:च्या इच्छेप्रमाणे शिक्षक बनायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. बी.एड.च्या शिक्षणासाठी त्यांचा धाराशिव येथील महाविद्यालयात नंबर लागला होता. त्यावेळी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कॉलेज फी भरण्यासाठी ३० हजार रूपये नसल्यामुळे त्यांनी तिकडे अॅडमिशन घेण्याचा नाद नाईलाजाने सोडून दिला. दरम्यानच्या काळात सोलापूर तरुण भारतमध्ये त्यांना शिकाऊ उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी खरेच सोने केले आहे.
तरूण भारतमध्ये ज्येष्ठ संपादक विवेकजी घळसासी, अरविंदजी जोशी, अरुणजी करमरकर, अनिलजी कुलकर्णी व नारायणराव कारंजकर यांच्या तालमीत सिद्धारामची जडणघडण झाली. चं. प. भिशीकर, मा. गो. वैद्य, रमेश पतंगे, मुजफ्फर हुसैन अशा विचारवंतांचा त्यांना स्नेह मिळाला. विवेकानंद केंद्रातील अनेक तपस्वी जीवनव्रती आणि कार्यकर्ते यांचा सहवासही लाभला. या अनुभवातूनच ते आज नि:स्पृह पत्रकार झाले. त्यांच्या चौफेर पत्रकारितेमुळेच आज त्यांना सकाळच्या सहयोगी संपादक होण्याचा एका अर्थाने बहुमानच मिळाला आहे. या साऱ्या वाटचालीत सिद्धाराम यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योतीकिरण यांची खंबीर साथ आहे.
- लेखक : दशरथ वडतिले, (माजी अध्यक्ष, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, मो.नं.- ९४२२४५७१००)
- (सोबत : सुजय निकते, मो.नं.- ९०२८८६२८१५)