आता शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी अनिवार्य; येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आता शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचं ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे. त्यासाठी शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दि. १५ फेब्रुवारीपर्यंत करावयाचे आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी करावी. राज ई-केवायसी केले नाही, तर दि.१५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा. या संदर्भात सर्व लाभार्थीं व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दि. १५ फेब्रुवारीपुर्वी १०० टक्के कामकाज पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करावा
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपुर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पुर्ण करावे. अशा सक्त सुचना सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना देण्यात येत आहे. वन नेशन वन रेशनकार्ड अंतर्गत राज्यातील जे लाभार्थी आपापल्या नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी.
केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटीत कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीनी स्वत:चे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांस जवळच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करून शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.