
सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात 4 दिवसाआड तर हद्दवाढ भागात 6 ते 7 दिवसाने पाणीपुरवठा (Water Supply)
केला जात आहे. परिणामी विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून आयुक्तांच्या कार्यालयासमोर माजी नगरसेवक व नागरिकांकडून माठ फोडण्यात आले.
भाजपचे (BJP) माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी गुरूवारी (ता. 2 मार्च) दुपारी एकच्या दरम्यान महापालिकेच्या (Corporation) पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुरेश पाटील म्हणाले, शहर असो किंवा हद्दवाढ भाग असो पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने नागरिकांना घेऊन आंदोलन करणार आहे. सोलापुरातील नागरिकांना आम्ही आव्हान करत आहोत की, शहरात पाणीपुरवठा न झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा आणि ज्यादिवशी पाणी येत नाही त्या दिवशी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत.
अशातच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरू असताना काही भागात गढूळ, दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या भागात स्वच्छ पाणी सोडण्यात यावे आणि काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी जादा दाबाने पाणी सोडण्यात यावे. अन्यथा भविष्यात अशी समस्या निर्माण झाल्यास महापालिकेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरेश पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला.