मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ कोटी २० लाख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात ४८१ कोटीचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा थाटात, ४० हजार महिला लाभार्थ्यांची तर ५५० महिला सरपंचाची उपस्थिती लक्षवेधक.

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणांचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणी शिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे-पाटील, शिवाजी सावंत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली,  सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री   फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलै चे प्रति महा पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेविषयी कोणी कितीही काही सांगितले तरी आम्ही ही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासन ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात २५ लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर राज्यात १ कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी 3 हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरून सौर पंप बसवून देण्यात येणार असल्याने पुढील २५ वर्ष विजेचा खर्च शेतकऱ्यांना येणार नाही. तसेच मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफी, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच मुलीच्या नावावर शासन पैसे टाकत आहे, एसटी बस मध्ये महिलांना  तिकीटामध्ये ५० % सवलत देण्यात आलेली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दहा लाख ७० हजार महिलांचे अर्ज प्राप्त झालेले असून सात लाख दोन हजार महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेचा उद्देश सांगून त्यांनी जिल्हा प्रशासनाने ही योजना राबवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री महोदय यांची अचानक तब्येत ठीक नसल्याने तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  जिल्हा प्रशासनाने माझी लाडकी बहीण योजना व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपसा सिंचन योजना तसेच अन्य योजनेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली चित्रफितीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *