डी. एड. बी. एड. स्टुडन्ट असोसिएशनची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
55 हजार शिक्षक भरती झालीच पाहिजे. शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण करावी. 2017 च्या नियमानुसार 1:10 पदासाठी दहा विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांना रोजगार निर्माण करून द्यावा. संचमान्यता व आधारकार्ड अपडेट लवकर करून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, अन्यथा येणाऱ्या काळात शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा डी. एड. बी. एड. स्टुडन्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, अनेक ठिकाणी अतिरिक्त शिक्षक व दुसरीकडे शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीसाठी 1:3 उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील खाजगी शाळेच्या व्यवस्थापनामध्ये अभियोग्यता परीक्षेद्वारे सर्वाधिक गुण असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावून शिक्षक निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी 2017 च्या भरती प्रक्रियेमध्ये 1:10 ही पद्धत होती. परंतू आता 1:3 याप्रमाणे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावून शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत खेळत आहे.
या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रसिद्धीपत्र काढले असून न्यायालय निर्णयानुसार 1:3 विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहे असे जाहीर केले आहे. परंतु यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळू शकणार नाही. शासनाची बिंदूनियमावली व संचमान्यता पूर्ण झाल्यावर शिक्षक भरती झालीच पाहिजे. परंतु आधारकार्ड अपडेटच्या नियमावलीनुसार शिक्षक भरती रखडत चालली आहे. शासनाने ही प्रकिया पूर्ण करून लवकरात लवकर भरती करावी.
2017 ची भरती अजून पूर्ण झाली नसून 2023 ची भरती प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु अनेक तांत्रिक कारणे सांगून शासन पळवाटा काढत आहे. तरी 55 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा येणाऱ्या काळात पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
80 टक्के शिक्षक भरतीला परवानगी
वित्त विभागने 80 टक्के शिक्षक भरतीला परवानगी दिली असताना अचानक शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेमध्ये निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु त्यांना अगोदर पेन्शन असताना परत त्यात कंत्राटी पद्धतीने त्यांना मानधन देण्यात येणार असल्यामुळे हजारो पात्राताधारक बेरोजगार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अगोदर भरती रखडत चालली असताना शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहे. राज्यात 68 हजार शिक्षकांची पदे रिक्त असताना कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमून शासन काय साध्य करणार आहे. त्याऐवजी नव्याने शिक्षकांची भरती करावी.
– प्रशांत शिरगुर, सह-सचिव, डी. एड. बी. एड. स्टुडन्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.