पद्मशाली सखी संघमचा उप्रकम; डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) यांचे आवाहन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : घरात बनविलेले पदार्थ खाल्याने आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका अथवा हानी होत नाही आणि त्यामुळे भूकही मिटते. शक्यतो घराबाहेर पडण्यापूर्वी भरपेट खा. बाहेरील पदार्थ खाणे टाळा; घरात बनवलेले अन्नपदार्थ खा; सदृढ आणि निरोगी राहा! असे आवाहन डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) केले आहे.
डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) म्हणाले, हल्ली बाजारात विक्री होणा-या पदार्थांमध्ये भेसळीचा प्रमाण वाढलेला आहे. गायी- म्हशींतून दूध जास्त प्रमाणात मिळावे, म्हणून काही लोक इंजेक्शन देत आहेत. तसेच प्लॅस्टिकमधून दुधाची विक्री होत आहे. दुधापासून बनविणारे पदार्थसुध्दा धोकादायक आहेत. प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले गरम पदार्थ खाल्यास आरोग्यावर परिणाम होतो. फ्रिजमधील पदार्थ पुन्हा-पुन्हा गरम करुन खाल्यास ते अतिरेक होऊन कॅन्सरला आमंत्रण देण्याचे काम केले जाते. आजकाल अनेकांना सूर्यप्रकाशात जायला नको वाटते. गेल्याने ‘व्हिटॅमिन डी’ मिळतो. व्यायाम, योगा, प्राणायाम, ध्यान आणि वॉकिंग करणे हे शरीराच्या फायद्यासाठी आहेत. पूर्वी घरातील खायचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले होते. लिंबू, आवळा, चिंच, संत्री, मोसंबी हे सर्व आरोग्यासाठी फायद्याचे आहेत. प्रामुख्याने शुध्द हळदीचा वापर केल्यास कॅन्सर टाळू शकतो. चायनीज पदार्थ व त्यापासून होणा-या रासायनिक सॉस हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. मैद्यापासूनही तयार होणारे पदार्थ खाल्याने माणूस स्थूल होतो.

श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्यावतीने महिलांसाठी ‘स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) बोलत होत्या.
हा कार्यक्रम दत्तनगर चौकाजवळील श्री समर्थ क्लिनिक येथे पार पडला. यावेळी डॉ. नम्रता गुल्लापल्ली (बिंगी) याप्रसंगी डॉ. नवनीता रच्चा (गुल्लापल्ली), सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, भाजपाचे ज्येष्ठ रामचंद्र जन्नू उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. नवनीता गुल्लापल्ली यांनी कोणत्या पदार्थांपासून कॅन्सर होतो याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. नवनीता रच्चा यांनी महिलांनी दोन महिन्यातून एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावा, असा सल्ला दिला. घरात असतानादेखील स्वतःची तपासणी कशी करावी, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी उपस्थित महिलांनी आरोग्याच्या समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्या.
प्रास्ताविक,सूत्रसंचालन सखी संघमच्या सल्लागार मेघा इट्टम, आभार प्रदर्शन हेमा मैलारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी संघमच्या कार्याध्यक्षा सविता येदूर, गीता भूदत्त, पल्लवी संगा, वनिता सुर्रम, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली, मल्लेशम जोगू उपस्थित होते.
