उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर; जिल्हास्तरीय रेशीम शेती मूल्यसाखळी विकास चर्चासत्र
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे. हिरज येथे रेशीम बाजारपेठ निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पीक कॅश क्रॉप असल्याने यातून शेतकऱ्याच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केले.
नियोजन भवन, सोलापूर येथे ‘एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प’ (आयटीडीपी) अंतर्गत रेशीम शेती मूल्यसाखळी विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उप-जिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर होते. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला, रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एस. एच. पवार, कृषी विकास तज्ञ (ITDP_PMC प्रायमूव्ह) जितेंद्र नाईक व शिरीष तेरखेडकर, प्रमुख समन्वयक भरत काळे, उपजीविका तज्ञ प्रविण कु-हे, स्थापत्य अभियंता विनायक जवळकोटे, क्षेत्र समन्वयक राहुल डफळ, जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक, तज्ज्ञ आणि अधिकारी यांच्यासह मोहोळ, माळशिरस,पंढरपूर तालुक्यातील ३० प्रगतशील रेशीम उद्योजक या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
- यावेळी उप-जिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाचा जिल्ह्यातील संभाव्य विकासावर दृष्टीक्षेप टाकून पर्यटन व कृषी व्यवसाय यांचे सुसंवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्ह्यात रेशीम शेतीला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचित केले.
- सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाची उद्दिष्टे व धोरणे याबाबत सखोल माहिती दिली. रेशीम विकास अधिकारी पवार यांनी तुती लागवड, कोष निर्मिती आणि शासकीय योजनांच्या मदतीने रेशीम उद्योग विस्तार याबाबत मार्गदर्शन केले.
- डॉ. एस. एच. पवार (सिंहगड इन्स्टिट्यूट) यांनी रेशीम उद्योगातील मूल्यसाखळी आणि अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर दिला. जितेंद्र नाईक (कृषी विकास तज्ञ, आयटीडीपी, पीएमसी प्रायमूव्ह) यांनी रेशीम उत्पादक कंपन्यांचे महत्त्व व उद्योगातील नव्या व्यावसायिक संधींवर प्रकाश टाकला. शिरीष तेरखेडकर यांनी उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना उत्तर देत, उद्योगवाढीसाठी उपयुक्त धोरणे आणि उपाययोजना याबद्दल चर्चा केली.
या चर्चासत्रात उपस्थित तज्ज्ञांनी रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी सहकार्य आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. जिल्ह्यातील रेशीम शेतीला गती देण्यासाठी नवीन व्यावसायिक संधी, सरकारी योजना व तांत्रिक प्रशिक्षणाच्या गरजेवर भर देण्यात आला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रमुख समन्वयक भरत काळे यांनी केले. त्यानंतर शिरीष तेरखेडकर (कृषी विकास तज्ञ) यांनी बैठकीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.