उष्माघात बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या रुग्णालय, आरोग्य केंद्रात घेऊन जावे
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर जिल्हयात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेंमधून पूर्वसुचना भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवली जात आहे. उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये म्हणून काय करावे? काय करु नये? याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमीत करण्यात येत आहे.
उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी:
- पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्धातासाच्या फरकाने पाणी प्यावे.
- घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी छत्री, अथवा टोपी व पांढरा शेला / दुपट्टाचा वापर करावा.
- सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणी झडपांचा वापर करावा.
- हलक्या पातळ व सच्छिद्र सुती खादी, पांढरा रंगाचे कपडयाचा वापर करावा.
- प्रवासात व कामाचे ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, जवळच व्यवस्था करावी
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS घरगुती उपचार लिंबूपाणी, ताक, लस्सी घ्यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनसेडचा वापर करावा व रात्रीस खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- घरामध्ये कुलर, पंखे, वातानुकुलीत (AC) याचा वापर करावा.
- सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना दयावे.
- गरोदर स्रिया व आजारी व्यक्ती, वयोवृद्ध, लहान मुले यांची अधिक काळजी घ्यावी.
- शिळे अन्न खाणे टाळावे.
- उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे.
- शक्यतो दुपारी १२ ते ३ या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे.
- चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे.
- प्राणी गुरे, जनावरे यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.
हे टाळावे :
- दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
- गडद, पट्टे व जाड कपडे घालणे टाळावे.
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.
- उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाने टाळावे.
- उष्माघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
- उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी.
- मद्य, चहा, कॉफी व कार्बनटेड शितपेय पिण्याचे टाळावे.
- शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे.
- उष्माघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधीत व्यक्तीचे अंग थंड पाण्याने पुसून काढावे.
- व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे.
उष्माघात बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे. बाधित व्यक्तीला त्वरीत हॉस्पीटलमध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरु शकते, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीने करण्यात येत आहे.