मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महत्त्व आणि मिळणारे लाभ

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महत्त्व आणि मिळणारे लाभ

मराठी भाषा, जी भारतीय उपखंडातील एक प्रमुख भाषा आहे, तिचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. हा निर्णय केवळ भाषिक ओळखीतच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही महत्त्वाचा ठरला आहे.

अभिजात भाषेचा दर्जा…

अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, आणि संस्कृतीच्या गौरवाचा मान्यता मिळवणे. मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष आहेत. या भाषेचा इतिहास प्राचीन असावा, त्यात मौल्यवान साहित्य असावे. ती दुसऱ्या भाषांवर अवलंबून नसावी. मराठी भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांचा आहे. तिचे साहित्य विविध शतकांमध्ये विकसित झाले आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होते, म्हणून केंद्र शासनाने दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे लाभ-

  • संशोधन आणि अभ्यासाला चालना: अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. भाषाशास्त्रज्ञ आणि संशोधकांना अधिक संधी उपलब्ध झाल्यावर मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर संशोधन मोहीम सुरू होऊन मराठी भाषा अधिक विस्तृत होईल.
  • विद्यापीठांमध्ये शिक्षण: भारतातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध होईल. मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही विद्यापीठात त्यांच्या मातृभाषेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मराठी भाषेचा अधिक प्रचार व प्रसार होऊन संपूर्ण देशभरात मराठी भाषेचे अभ्यासक निर्माण होती. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये लिखाण करतील, त्यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात आणखी भर पडेल.
  • प्राचीन ग्रंथांचे अनुवाद: मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात सुरुवात होईल. या ग्रंथांचा व्यापक प्रसार होईल आणि त्यांचे महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मराठीतील हे प्राचीन ग्रंथ अनेक भाषांत अनुवादित झाल्यानंतर मराठी भाषा ग्रंथ संस्कृती यांचा अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास मदत मिळणार आहे.
  • ग्रंथालयांचे सशक्तीकरण: राज्यातील हजारो ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील ग्रंथालयांना अधिक संसाधने आणि अनुदान मिळेल. त्यांचे कार्यक्षेत्र वाढेल. प्रत्येक ग्रंथालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रंथ साहित्य खरेदी होईल व ते पर्यायाने मराठी भाषिक वाचकापर्यंत पोहोचेल त्यातून मराठीचा साहित्याचा प्रचार प्रसार होऊन भाषा अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहील.
  • संवर्धनासाठी मदत: मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळेल. भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातील. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रचार प्रसारणासाठी तसेच भाषा वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणे शक्य होणार आहे. हे मदत मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम ग्राम स्तरापासून ते शहरी भागापर्यंत राबवणे शक्य होणार आहे. त्यातून मराठी भाषेचा अधिक जोमाने विकास होण्यास नक्कीच मदत मिळेल.
  • राष्ट्रीय पुरस्कार: अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येकवर्षी मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. असे पुरस्कार मिळाल्यास मराठी भाषा संवर्धनात कार्य करणाऱ्या अनेकांसाठी ते प्रोत्साहन ठरेल. त्यातूनच मराठीचा विकास होण्यास मदत मिळेल.

मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व-

मराठी भाषा केवळ एक संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी भाषेत अनेक महान कवी, लेखक आणि विचारवंत झाले आहेत, ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

मराठी भाषेच्या साहित्याने भारतीय साहित्याला एक अद्वितीय स्थान दिले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांनी मराठी भाषेत आपल्या विचारांची मांडणी केली आहे. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.

भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता-

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर, मराठी भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता अधिक महत्त्वाची बनली आहे. भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जावे लागतील, जसे की:

  • भाषाशास्त्रीय संशोधन: भाषाशास्त्रज्ञांनी मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

  • साहित्यिक उपक्रम: साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे.

  • तंत्रज्ञानाचा वापर: डिजिटल माध्यमांचा वापर करून मराठी भाषेचा प्रसार करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यास, संशोधन, आणि साहित्यिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि तिचा विकास होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातही ही भाषा समृद्ध राहील.

मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेच तसेच ते प्रयत्नही करत आहे. परंतु प्रत्येक मराठी भाषिकाची ही जबाबदारी आहे की, आपली मातृभाषा समृद्ध झाली पाहिजे तर चला आपण सर्वजण मिळून मराठी भाषेचे संवर्धन करूया. जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या समृद्ध वारशाचा भाग बनू शकतील.

  – सुनील सोनटक्के,

 जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *