वैभव काळे यांनी ३ हजार अंडीपुंजतून घेतले २ हजार ६८० किलो रेशीम कोषांचे उत्पादन
- सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये १ हजार १७ शेतकऱ्यांकडे १ हजार २६० एकरावर रेशीम उद्योग सुरु आहे. त्यापैकी वैभव भिमराव काळे (मौजे कंदर ता. करमाळा) यांनी सर्वाधिक रेशीम कोषांचे उत्पादन करीत १४ लाख ७ हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. त्यांनी अंडीपुंज ३ हजार घेऊन २ हजार ६८० कि.ग्रॅ. रेशीम कोषांचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी यातून १४ लाख ७ हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या व रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी दिली.
- उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन करणारे शेतकरी:
- मौजे निमगाव (ता.माळशिरस) येथील शेतकरी जगन्नाथ पंढरीनाथ मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या- २ हजार २००, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. १ हजार ७६०, प्राप्त रक्कम १० लाख ८ हजार ४८० रुपये इतकी आहे.
- जयसिंग साहेबराव मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या- २ हजार ८००, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. २ हजार ११०, प्राप्त रक्कम ११ लाख ३४ हजार. रुपये इतकी आहे.
- हणमंत तुकाराम सांगोलकर (मौजे भंडीशेगाव ता.पंढरपूर) यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या-३ हजार २००, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. २ हजार २५७ प्राप्त रक्कम १३ लाख २० हजार ३४५ रुपये इतकी आहे.
- सौदागर पांडुरंग पांडव (मौजे पिरटाकळी, ता. मोहोळ) यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या- २ हजार ५०, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. १ हजार ७०१ प्राप्त रक्कम ८ लाख ३३ हजार ४९० रुपये इतकी आहे.
- श्रीशैल मलकाप्पा नंदगाव (मौजे हत्तीकणबस, ता. अक्कलकोट) यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या- १ हजार ५०, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. ८९७, प्राप्त रक्कम ४ लाख ७२ हजार ५६० रुपये इतकी आहे.
सध्या जिल्ह्यातील महारेशीम नोंदणी अभियान सुरु आहे. रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी नांव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय (हिरज, ता. उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर) येथे करावी. रेशीम उद्योगामधून शेतकऱ्यांनी लक्षाधीत व्हावे. लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये soil to Fabric प्रकल्प राबवीत आहोत. ज्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वत:चा रेशीम कोष विक्री करणे सोयीचे होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुशल विणकरांना कपडा निर्मितीपर्यंत रोजगार उपलब्ध होईल. ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याची आर्थिक उन्नती होईल. असे आवाहनही जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी केले आहे.
